विचार असे पडावेत?
विचार असे पडावेत?
कोणत्याही धर्माचे मोठमोठाले ग्रंथ म्हणजे त्या त्या काळातील विद्वान लोकांनी मांडलेले आपले विचार आहेत. काळ बदलला, बऱ्याच गोष्टी बदलल्या. त्यामुळे त्यांत खूप साऱ्या गोष्टी अतिहुशार लोकांनी त्यांच्या मनाने बदलून टाकल्या, म्हणून एकाच पौराणिक घटनेचे विविध ठिकाणी विविध संदर्भ सापडतात. एक काळजी मात्र सतत घेतल्या गेली, ती म्हणजे त्या घटना कालबाहय होऊ नये म्हणून त्याला वेळोवेळी 'अंधश्रद्धेची', लोकांच्या भाषेत श्रद्धेची किंवा चमत्काराची 'मसालेदार फोडणी' काही ना काही लोकांनी नेहेमी दिली आणि आजही देतच आहेत.
शिक्षणाचा उपयोग जर विज्ञान शिकण्यात कमी आणि भाकडकथा पसरवण्यात जास्त केला तर त्याचा उपयोग शून्य. म्हणून करोडो वर्षांआधी झालेली विश्वाची उत्क्रांती वैज्ञानिक पद्धतीने समजून घेतली पाहिजे. बहुविश्व किंवा समांतर बह्मांड या असंख्य ग्रह ताऱ्यांच्या पसाऱ्यात असेल किंवा नसेल? आपली पृथ्वी जिचे अस्तित्व त्या समोर एका धुळीच्या कणापेक्षाही लहान आहे, आपल्या आकाशगंगेच्या सर्वात मोठ्या सूर्यापेक्षा लाखो करोडोपट मोठे आणि तेजस्वी तारे या अफाट अंतरिक्षात आहेत. मग जीवन आणखी कुठे असेल किंवा नसेल? प्रकाशवर्ष म्हणजे किती भन्नाट कल्पना आहे ना? असे प्रश्न पडायला हवेत.
सेकंदाला ज्याचा वेग तीन लाख किलोमीटर आहे असा प्रकाश, आता विचार करा एका वर्षात साधारण तीन करोड पंधरा लाख छत्तीस हजार सेकंड्स असतात तर या संख्येला तीन लाखाने गुणले तर आपल्याला तो प्रकाश किती अंतर कापतो 'एका वर्षात' ते कळते. आकडा लिहिता पण येणार नाही इतका मोठा झाला ना? खरी गंमत तर आता आहे, तो भला मोठा आकडा जो आता समजण्याचा आपण प्रयत्न केला होता जो एका वर्ष्यात प्रकाश किती दूर जातो, त्याचा अंदाज देत होता. त्याला पंचवीस हजारांनी गुणले तर आपल्याला सर्वात जवळची दुसरी आकाशगंगा मिळेल 'कॅनिस मेजर डवार्फ' या नावाची ज्यात साधारण शंभर करोड च्या वर ग्रह तारे असल्याचा अंदाज आहे.
हे सर्व आकडे वाचून माझे तरी डोके चक्रावले आहेत. विषय खूप खोल आहे, प्रश्न सुद्धा त्या अमर्यादित ग्रह ताऱ्यांएवढेच आहेत. असे प्रश्न पडायला हवेत तेव्हा काही तरी नवीन शिकायला मिळेल. बिग बँग थिअरी शिकायला हवी आणि आपण काय शिकतो तर प्रत्येक धर्म आपल्या देवाच्या नावाने कथा सांगतो, कि त्यांच्या पुराणानुसार हे सर्व कसे सुरु झाले. एका व्यक्तीला त्याच्या जीवनकाळात या सर्व कल्पक गोष्टींबद्दल जाणून घेणे अशक्य आहे म्हणून त्याने तितका तरी जाणून घ्यायचा प्रयत्न करावा जितका विज्ञानाने शक्य आहे.
शेवटी त्याला त्याची स्वतःची हि बुद्धी आहेच, म्हणून निर्णय तुमचा कि कशावर विश्वास ठेवायचा? विज्ञानावर कि हजारो वर्ष्यांपासून स्वार्थी लोकांनी बदलवलेल्या पुराणावर? विषय नक्की वादग्रस्त आहे कारण संपूर्ण विज्ञानवादी असणं बऱ्याच लोकांच्या पचनी पडत नाही. निदान माझे असे मत आहे.
- अमूल (०८ जुलै २०२३)
Comments
Post a Comment